"काळजी करू नका...लवकर बरे व्हा..."मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

- दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद

- जखमींना तातडीची २५ हजार रूपयांची मदत

सांगली दि. ७

   कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार, ५ जुलै २०२२ रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील १७ वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधून काळजी करू नका...लवकर बरे व्हा... अशा शब्दांत दिलासा दिला. तसेच अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांना सर्व जखमी वारकऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यात यावी. ‍मिरज सिव्हील रुग्णालय येथील वैद्यकीय उपचारांव्यतिरीक्त अन्यत्र खाजगी ठिकाणी उपचारांची आवश्यकता असल्यास त्याचाही सर्व खर्च शासन करेल. जखमी वारकऱ्यांची मागणी असल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी हलविण्याबाबतही कार्यवाही करावी, असे निर्देशित केले. यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जखमी वारकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रूपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, माझे बोलणे झाले आहे. त्यांना आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ‍ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मिरज सिव्हील रुग्णालय येथील जखमी वारकऱ्यांशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी आमदार अनिल बाबर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे उपस्थित होते.


            आमदार श्री.बाबर म्हणाले, जखमी वारकऱ्यांची वैद्यकीय यंत्रणेने अत्यंत चांगली काळजी घेत उपचार केले आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर होती. आज सर्वांची प्रकृती चांगली आहे. मिरज सिव्हील येथील व्यवस्थेव्यतीरिक्त अन्य व्यवस्था करावी लागल्यास त्याचाही खर्च सरकार करेल. पांडुरंगाच्या आर्शीवादाने सर्व वारकरी रूग्ण लवकरात लवकर बरे होवून घरी जातील. शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असून तोपर्यंत तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रत्येकी २५ हजार रूपये उपलब्ध करून देत असल्याचे ही आमदार श्री. बाबर यांनी यावेळी सांगितले.